
"हा शक्तिचा दुर्व्यय आहे ना ? बर तर देशसेवेसाठी या परिस्थितीत आणखी आधिक महत्वाचे एखादे कृत्य तुम्ही काय करू शकता आहां काय ? जो हो म्हणेल त्याने हे काम न करता ते अधिक महत्वाचे कार्य करावे. पण हाच वेळ केवळ रिकामी चिंता आणि तळमळ करीत वा आपसात निरर्थक वादविवाद करीत घालविण्यापेक्षा तर या तुच्छ पतितांना शिक्षण देण्यात, त्यांची मनःप्रवृत्ती परोपकारी करण्यात तो वेळ जावा हे अधिक देशकल्याणकारक नव्हे काय ? आणखी असे पाहा की आपण गावागावातून प्राथमिक शाळा काढण्याचे ठराव आणतो. ते शिक्षण देण्यास कोणी तरी पुढे आले पाहिजेना ? प्राथमिक शाळांत असा शिकवित जन्म घालविण्याचे व्रत कोणीतरी घेतलेच पाहिजेना ? मग ते त्रासदायक काम आम्हीच का करू नये ? आम्ही तेवढे अध्यापकांच्या लठ्ठ पगाराच्या आणि मानाच्या खुर्च्या आडवाव्या आणी खेड्यांतून बाराखड्या घोकित शिक्षण देण्याचे त्रासदायक काम इतरांनी करावे ही इच्छा अन्याय्य नाही का ? पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास अवश्य आहे. मोठमोठे पंडित मिशनरी युरोपिय तुरूंगात केवळ या कार्यास आपले आयुष्य वाहून घेतात. मग आपण या ठिकाणी त्याच दृष्टीने तेच कार्य का करू नये ? आपल्या संगतीत ते येताच स्वराष्ट्र, स्वदेश, स्वजाती यांच्या कल्पना त्यांच्या मनात उभ्या राहतात. आपण त्यास इतिहास सांगतो तेव्हा त्यांच्या तोंडावरही तेज चमकू लागते, ते पतित आहेत ? आणी आपण कोण आहोत ? उपजत मुक्त थोडेच आहोत ! सुधारले तर तेही सुधारतील. म्हणून जोवर दुसरे अधिक महत्वाचे देशकार्य करिता येत नाही तोवर हे अत्यंत त्रासदायक पण म्हणूनच जे करण्यात खरी देशसेवा आहे ते, आपल्या या हीन दीन पतित बंधूस आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके तरी शाब्दिक, बौद्धिक, राष्ट्रीय आणी आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करीत राहिले पाहिजे."
{माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर}

