Saturday, October 24, 2009

स्वातंत्र्यविर सावरकर लिखित माझी जन्मठेप मधील एक उत्तम उतारा



"हा शक्तिचा दुर्व्यय आहे ना ? बर तर देशसेवेसाठी या परिस्थितीत आणखी आधिक महत्वाचे एखादे कृत्य तुम्ही काय करू शकता आहां काय ? जो हो म्हणेल त्याने हे काम न करता ते अधिक महत्वाचे कार्य करावे. पण हाच वेळ केवळ रिकामी चिंता आणि तळमळ करीत वा आपसात निरर्थक वादविवाद करीत घालविण्यापेक्षा तर या तुच्छ पतितांना शिक्षण देण्यात, त्यांची मनःप्रवृत्ती परोपकारी करण्यात तो वेळ जावा हे अधिक देशकल्याणकारक नव्हे काय ? आणखी असे पाहा की आपण गावागावातून प्राथमिक शाळा काढण्याचे ठराव आणतो. ते शिक्षण देण्यास कोणी तरी पुढे आले पाहिजेना ? प्राथमिक शाळांत असा शिकवित जन्म घालविण्याचे व्रत कोणीतरी घेतलेच पाहिजेना ? मग ते त्रासदायक काम आम्हीच का करू नये ? आम्ही तेवढे अध्यापकांच्या लठ्ठ पगाराच्या आणि मानाच्या खुर्च्या आडवाव्या आणी खेड्यांतून बाराखड्या घोकित शिक्षण देण्याचे त्रासदायक काम इतरांनी करावे ही इच्छा अन्याय्य नाही का ? पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास अवश्य आहे. मोठमोठे पंडित मिशनरी युरोपिय तुरूंगात केवळ या कार्यास आपले आयुष्य वाहून घेतात. मग आपण या ठिकाणी त्याच दृष्टीने तेच कार्य का करू नये ? आपल्या संगतीत ते येताच स्वराष्ट्र, स्वदेश, स्वजाती यांच्या कल्पना त्यांच्या मनात उभ्या राहतात. आपण त्यास इतिहास सांगतो तेव्हा त्यांच्या तोंडावरही तेज चमकू लागते, ते पतित आहेत ? आणी आपण कोण आहोत ? उपजत मुक्त थोडेच आहोत ! सुधारले तर तेही सुधारतील. म्हणून जोवर दुसरे अधिक महत्वाचे देशकार्य करिता येत नाही तोवर हे अत्यंत त्रासदायक पण म्हणूनच जे करण्यात खरी देशसेवा आहे ते, आपल्या या हीन दीन पतित बंधूस आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके तरी शाब्दिक, बौद्धिक, राष्ट्रीय आणी आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करीत राहिले पाहिजे."

{माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर}

Friday, October 16, 2009

मित्रांनो रामराम - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


"डोळ्यांत तेल घालून आपल्या राष्ट्रमातेच्या प्रगतीवर जागरूक लक्ष ठेवा. इतके कार्य झाले किंवा इतका प्रयत्न केला या मोजमापावर प्रगतीचे मूल्य ठरवू नका; तर आपल्या लोकांनी किती क्लेश सोसले नि किती आत्मत्याग ते सतत करू शकले या कसोटीवर त्या प्रगतीचे मूल्यमापन करायला शिका. कारण कार्यनिष्पत्ती हा योगायोग आहे; परंतु आत्मत्याग हा नियम आहे. आत्मत्यागाच्या खंबीर पायावरच अभिनव नि अतिभव्य राज्यांची विभवमंदिरे उभी राहतात. हुतात्म्यांच्या रक्षेत रूजलेले राज्यवृक्षच विस्तीर्ण वाढतात, विभवसंपन्न होतात. इश्वराने दिलेला प्राण त्याच्या चरणी पुन्हा अर्पण करीपर्यंत आणी इश्वरी कार्याची परिपूर्तता होईपर्यंत अशा अभिनिवेशाने कार्य करीत राहा की एकतर हुतात्म्याची पुष्पमाला तरी मस्तकावर मिरवाल किंवा विजयाचा तेजोमुकुट तरी जिंकून घ्याल ! येतो ! प्रिय सुहृदांनो ! माझा हा अखेरचा प्रणाम स्वीकारा !"

वंदे मातरम् !


हुतात्मा बाळकृष्ण हरि चापेकर यांचा एक अल्पज्ञात पराक्रम


मुंबईस आताच्या डॉ. भडकमकर रोडवर 'चुनाम किल्न' लेनमधील आपल्या नवीन बंगल्यात प्रो. एन्. जी. वेलीनकर राहात असे. त्यानी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला होता. हिंदु देव देवतांची निंदा करणे हा त्याचा धंदा होऊन बसलेला होता. सुधारकांवर नि अशा बाटग्यांवर चापेकरांचा राग असे. तेव्हा ३१ ऑगस्ट १८९६ ला आपले एक मित्र दत्ता भुस्कुटे नि बापुराव चापेकर यांच्यासह दामोदरपंत रात्री वेलिनकरांना भेटायला गेले. आपणास ख्रिश्चन व्हायचे आहे, असे सांगून त्यांनी घरात प्रवेश मिळवला. तेथे वेलिनकरांनी चापेकरांसमोर हिंदु देवतांची हेटाळणी सुरू केली. एव्हाना रात्रीचे १०.३० वाजले होते. धर्मांतराच्या गप्पात बापुराव चापेकरांनी आपल्या हातातील पोलादी काठीचा फटका वेलीनकराच्या डोक्यावर हाणला आणि दूसरा पाठीत. मग तिघेही निघून गेले. पुढे वेलीनकरला, " तू स्वधर्म सोडून परधर्मात गेलास, करता हे सौम्य प्रायश्चित्त देऊन आम्ही कोल्हापूरला निघून गेलो !" असे पत्रही चापेकरांनी पाठविले. पण पोलिसांना वेलिनकराचे मारेकरी सापडले नाहीत.

देश द्रोही द्रविड बंधुंचा वध


वासुदेवराव चापेकर व महादेवराव रानडे हे लुंगी नेसून, जाकीट घालून, डोक्याला फेटा घालून पठाणी पोलिसाच्या वेषात भरलेली पिस्तुले घेऊन, पुण्यातील खुन्या मुरलीधराच्या बोळात द्रविडांच्या वाड्यात गेले. तेथे माडीच्या खालूनच त्यांनी विचारले,

"गणपतराव इथेच राहतात काय ?"

द्रविडने माडीवर मित्रांसह बिजिकचा डाव मांडलेला होता. त्याने बाहेर येऊन हिंदुस्थानीत विचारले,

"कौन है ?"

वासुदेवरावांनी मग वर जाऊन म्हटले की,

"तुमको ब्रुईन साहेबने आपने बंगलेपर बुलाया है !"

येताना रामचंद्रालाही घेऊन या असेही त्यांनी सांगितले. पाचच मिनिटात बक्षिसाच्या लोभाने दोघे द्रविड बंधू कपडे करून खाली आले. आणि त्या शिपायांबरोबर चालू लागले. वासुदेवराव म्हणाले,

"आपण प्रथम फरासखान्यावर जाऊ नि मग टांगा करून लष्करात (कँपात) ब्रुईनसाहेबाच्या बंगल्यावर जाऊ."

वळणावर ते वळले नि वासुदेवराव व रानडे यांनी आपली भरलेली पिस्तुले हातात घेऊन रस्त्यावरच्या दुसर्‍या दिव्याजवळ, आपली तोंडावरली उपरण्याची आवरणे काढून रात्री ९.३० वाजण्याच्या क्षणभर आधीच पिस्तूल नि रिव्हॉल्वर अनुक्रमे रामचंद्र नि गणेश शंकर द्रविड यांच्या पाठीत झाडले. दोन आवाज झाले. त्यावेळी ९.३० झालेले होते. पुण्यात त्याकाळी दररात्री साडे नऊला तोफ उडत असे. लोकांना वाटले तोफेचेच हे आवाज.

द्रविड वधाची ही जागा आताच्या टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या ५२१ सदाशिव पेठ येथील कार्यालयसमोरील रस्त्यावर आहे. जवळच्याच शिवाजी मंदिर नि पेरूगेटकडे जाणार्‍या रस्त्याच्या चौकात पहार्‍यासाठी वासुदेवरावांनी खंडेराव साठे यांना सशस्त्र उभे केले होते. कामगिरी फत्ते झाल्यावर सगळे जण हत्यारे खिशात टाकून धावतच जवळच्या नातूवाड्यावरून आपल्या घरी लोंढ्यांच्या वाड्याकडे धावत गेले.

गोळ्या लागताच "खून ! खून ! पोलिस ! पोलिस !" असे ओरडत दोघेही हरामखोर द्रविड बंधू रस्त्यावर कोलमडले. खर्‍या पोलिसांनी त्यांना ससून हॉस्पिटलात हालवले. पण तेथे दोघेही दुसर्‍याच दिवशी मरण पावले. दामोदरपंत चापेकर यांच्या फाशीस कारणीभूत ठरलेल्या देशद्रोहाबद्दलचे असे बक्षिस चापेकर व रानड्यांनी द्रविड बंधुंना दिले.

हुतात्मा वासुदेव हरि चापेकर यांचा पराक्रम


वासुदेवराव चापेकर व महादेव रानडे यांना ब्रुईन साहेबाने चौकशी करता पुण्यातील फरास खाना चौकीवर चौकशी करीता बोलावलेले होते. फरास खान्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत त्यांना ठेऊन प्रश्न विचारण्यात आले. रामा पांडू फौजदार तेथे होताच.पण ब्रुईनही होता. चौकशीत रामा पांडूने त्यांना जातीविषयक शिव्या दिल्या.

"पेशवाई घालवली..... आता इंग्रजांचेही राज्य बुडवायला निघाले आहेत."

यावर वासुदेवराव चापेकरांनी सुद्धा त्याला अगदी पुणेरी इरसाल शिव्या दिल्या.

शेवटी रामा पांडु म्हणाला, "चापेकर तेवढे साले हराम खोर ! नि तुझ्या अंगावर काय लपवल आहेस ? "

असे म्हणत त्यांचे धोतर चापपण्यासाठी सरसावला.

त्यासरशी वासुदेवरावांनी, " त्या दिवशी वाचलास.........."

असे म्हणून अनपेक्षितपणे पटकन आपले पिस्तूलच बाहेर काढले नि ते ताडकन रामा पांडूवर झाडले. पण त्यांची गोळी पांडुच्या केवळ एक इंचावरून गेली व तो बचावला. या प्रकाराने संपूर्ण फरासखाना हादरला. पण तेवढ्यात ब्रुईनने व इतरांनी चापेकरांच्या ताब्यातून झटकन पिस्तूल ताब्यात घेतले. रामा पांडुला गर्भगळीत व्हायची पाळी आलेली होती.

वासुदेवराव ब्रुइनला अत्यंत तेजस्वी पणाने म्हणाले,

" होय, आम्हीच ! आम्हीच काल द्रविडांना ठार मारले. काल मोका मिळाला नसता, तर आम्ही द्रविडांना भर कोर्टात ठार केलं असत ! चापेकर हराम खोर व भित्रे नाहीत ! राष्ट्र कार्यासाठी ते हसत हसत फासावर जातात. आम्ही पण अण्णांच्याच (हुतात्मा दामोदर हरि चापेकर - थोरले बंधु) मार्गाने जाणार."

त्यांचे ते रौद्र तांडव बघून ब्रुईन, केनेडी इ. गोरे पोलिस अधिकारी चांगलेच हादरून गेले.

Friday, August 21, 2009

हुतात्मा दामोदर हरि चापेकर - १ पत्र


" आजपर्यंत आपण उभयतांनी आम्हास पुष्कळ प्रकारे बोध केला. परंतु आम्हास रूचला नाही. व अजूनही आम्ही केले हे वाईट केले असे आम्हास वाटत नाही. इतकेच नाही तर पुढे फासावर जाताना सुद्धा वाईट वाटणार नाही. याविषयी आम्ही पदर पसरून माफी मागतो. आम्ही ज्यावेळी भयंकर कृत्यास हात घालीत होतो. त्यावेळी भावी स्थिती मनात येत नसे असे नाही. पण त्याची पर्वा करीत नव्हतो व आताही आम्ही करीत नाही. लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा आम्ही या अंतकालच्या मिरवणुकीस जास्त महत्व देतो."


हुतात्मा दामोदर हरि चापेकर

- (वडिलांना लिहिलेले पत्र - दि.१२/१०/१८९७)

Sunday, August 16, 2009

हुतात्मा वासुदेव हरि चापेकरांचा एक पराक्रम


रामा पांडु हा फौजदार हराम खोर होता. चापेकर बंधुंच्या प्रत्येक धर्म कार्यात त्याने सतत काम केलेले होते. तो पुण्यातील जोगेश्वरीच्या बोळात रहात असे. प्रतिदिनी संध्याकाळी फरासखान्यातून तो इकडे जाई. तेव्हा भरलेली पिस्तुले घेऊन वासुदेवराव चापेकर नि रानडे जोगेश्वरीच्या देवळाच्या बाहेरील ओट्यावर बसले. २५ जानेवारी १८९८ ला रात्री ८.३० वाजता रामा पांडू फरास खान्याबाहेर पडून चालत तिथे येताच वासुदेवराव तीरासारखे त्याच्यामागे धावले. त्यांच्यासवे रानडेही धावले. वासुदेवरावांनी रामा पांडूच्या दोन्ही खांद्यात झटकन गोळी झाडली. ती त्याला लागताच ते दोघे तसेच मागे फिरून जवळच्या चिपळूणकरांच्या दगडी फरशीच्या बोळात रानड्यांसह पळाले. तोच त्या बोळातून पलीकडून २ पोलिस उलट दिशेने येताना त्यांना दिसले. तेव्हा रानड्यांनी धावता धावता आपले पिस्तूल त्यांच्या मध्यात झाडले. तेव्हा घाबरून त्यापैकी एक शिपाई एका बाजूला नि दूसरा शिपाई दुसर्‍या बाजूच्या भिंतीला चिकटून अंग चोरून उभे राहिले. वासुदेव राव नि रानडे त्यांच्यामधून क्षणार्धात पुढे निसटून गेले. पिस्तूलातील काही तांत्रिक दोशांमूळे रामा पांडू मरता मरता वाचला.